नांदेड - इस्लापूर येथून जवळच असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्यात चार पर्यटक बुडाले. त्यापैकी एकाचा शोध लागला आहे. मात्र, तिघे जण अद्याप नदीपात्रात आहेत. बुडालेल्या तिघां पर्यटकांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. बुडालेल्या तिघांना शोधण्यासाठी स्थानिक मच्छीमार , पोलीस आणि जीवरक्षक दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
आज सकाळी पैनगंगा नदी पात्रात अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या आठ पर्यटकांपैकी चार पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले, तर तिघे अद्याप बेपत्ता आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथे ही घटना घडली.
हे आठही पर्यटक तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळत आहे. रफीयोद्दीन, आक्रम, सोहेल, नद्दीम ही नदीपात्रात वाहुन गेलेल्यांची नावे आहेत. नद्दीम नावाचा पर्यटक वाचला असुन रफीयोद्दीन, आक्रम, सोहेल हे अद्याप बेपत्ता आहेत. नदी पात्रात वाहुन गेलेल्या पर्यटकांचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती इस्लापूर पोलिसांनी दिली.