नांदेड - ज्याप्रमाणे धार्मिक कारणांसाठी अखंड हरिनाम, पारायण, शिवनाम, रामायण सप्ताह पाळला जातो. अगदी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार जनमानसात रुजवण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवविचारांचे पठन व पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थी व तरुणांनी सहभाग घेतला आहे.
गावागावात दरवर्षी सार्वजनिक शिवजयंतीचे कार्यक्रम होतात. जयंती साजरी करताना महाराजांच्या विचारांचा जागर मात्र होताना दिसत नाही. वाजत आणि नाचत त्यांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे चरित्र वाचून विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे मत शिव पारायण सोहळ्याचे आयोजक हनुमान फाटेकर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरीत्र ग्रंथाचे पठन -
लोणी बुद्रुक गावात येथे गेल्या तीन वर्षांपासून शिवपारायणाचा हा उपक्रम राबवला जात आहे. यावर्षी देखील १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरीत्र या ग्रंथाचे पठन केले जात आहे.
तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांसाठी उपक्रम -
शिवरायांचे विचार, त्याचे कर्तृत्व याबद्दल तरुण आणि विद्यार्थ्यांना माहिती व्हावी. एक चांगला समाज घडावा आणि प्रत्येकाला आपला वारसा नेमका काय आहे याची जाणीव व्हावी. या हेतूने 'शिवचरित्र पारायण' सोहळा आयोजित करत असल्याचे आयोजक हनुमान फाटेकर यांनी सांगितले.
शिवजयंती नियमावली-
अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरी इतर किल्ल्यांवर जाऊन १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.