नांदेड - शहर व परिसरात घरफोडी आणि वाटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांचा क्रम पाहता सराईत टोळीचा यात सहभाग असल्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची पथके कामाला लागली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. घरफोडी, लुटमारी करणाऱ्या टोळीतील चौघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या आरोपींच्या नावे विविध पोलीस ठाण्यात ३४ गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
हेही वाचा- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले
चोरी, घरफोडी व लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. पदभार स्वीकारताच पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली. दोन अट्टल गुन्हेगार माळटेकडी भागात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पथकाला मिळाली. पोलिसांनी आकाश बंडू गुजावळे (वय २१ रा. गोपाळनगर बायपास रोड नांदेड) व उत्सव महादू बलाड (वय १९ रा. माळटेकडी पुलाजवळ नांदेड) या दोघांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गेल्या सहा महिन्यात आसना ते चैतन्यनगर रस्ता, माळटेकडी पुलाखाली, कॅनाल रोड, निळा रोड, सोनखेड रोड, सिडको रोड, सोनखेड मार्गावर आठ जणांना अडवून लोखंडी रॉड व खंजीरने मारहाण करून लुटल्याची कबूली दिली.
घरफोडीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगार संजय उर्फ समिर पंडित नामनूर (वय २८) व सय्यद हनीफ उर्फ हनी सय्यद जाफर (वय २०) दोघे राहणार महेबुबनगर, नांदेड यांना ताब्यात घेतले. या आरोपींनी नांदेड शहरातील शिव विजय कॉलनी, संभाजीनगर, कॅनाल रोड, चैतन्य नगर, वैशाली नगर तरोडा बु., मंत्रीनगर, दिपनगर, संकेत नगर, बालानगर, स्वस्तीक नगर, सहयोग नगर, आनंदनगर, ज्ञानेश्वर नगर आदी भागातील घरे फोडली. रिंग रोडवर महिलांचे सोन्याचे दागीने हिसकावणे, काबरानगर भागातून पाच दुचाकी चोरुन नेल्याची कबूली दोघांनी दिली आहे. १९ गुन्ह्याची शहानिशा पोलिसांनी केली आहे. चौकशीत आणखी काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केली. ही कारवाई पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरिक्षक देवकते यांच्या पथकाने केली.