नांदेड : मागील काही दिवसांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ (Suicide incident increased) होत असल्याची चित्र आहे. एकट्या नांदेड शहरात मागील काही दिवसांत दोन तरुणींनी गोदावरी व आसना नदीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्यात यश आले, तर एका इंजिनिअरिंगच्या तरुणीने व अकरावीतील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, कौटुंबिक अडचणी यासह अन्य कारणांमुळे विद्यार्थी मृत्यूला कवटाळत आहेत. (mental stress of youth increased) (overwhelmed by likes comments on social media)
नैराश्याची लक्षणे - सोशल मीडियावर रममाण झालेली तरुणाई लाइक, कमेंटमध्ये गुरफटली असून त्यांच्यात मानसिक तणाव वाढत आहे. परिणामी नैराश्यात तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले. नैराश्य वाढण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. माणसातील सकारात्मकता कमी होते, तो निरुत्साही होतो, झोप लागत नाही, भूक लागत नाही, कामात मन लागत नाही, उदास वाटते ही नैराश्याची लक्षणे आहेत. तसेच विविध व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. व्यसन मानसिक आरोग्य बिघडवते.
वॉर्निंग सिग्नल वेळीच ओळखा - आत्महत्येपूर्वी एखादा व्यक्ती वॉर्निंग सिग्नल देते. आत्महत्या करण्यापूर्वी एक ते दोन आठवडे आधी त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात, स्वभावात बदल होतात. एकटा राहायला लागतो. छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो, राग येतो. मित्रांसोबत, नातेवाइकांसमोर मला करमत नाही, आत्महत्येचा विचार येतात, असंही तो बोलून जातो. झोप, जेवण, वजन कमी होते. हे बदल जवळच्या व्यक्तीने टिपले तर त्याच्यावर वेळीच उपचार करून आत्महत्येपासून रोखता येते.
पालकांनी चांगला संवाद ठेवावा - पालक-पाल्य यांच्यात पूर्वीसारखा संवाद राहिला नाही. मैत्रीचे नात आणि सुसंवाद ठेवला तर पाल्याला काही समस्या आली तर बोलेल. पालकांना वॉर्निंग सिग्नल टिपता आले पाहिजे. करिअर, जीवनाचा साथीदार याबाबतच्या निर्णयाबाबत तरुणाईच्या मताचा विचार करायला हवा.
मानसिक ताण वाढण्याची कारणे :
1) करिअर आणि अभ्यासात येणारे अपयश
2) प्रेमभंग, मित्र-मैत्रिणींमध्ये होणारे वाद यातून एकटेपणा येतो.
3) आर्थिक बाजू कमकुवत असली तर विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होतो.
4) पालक व शिक्षक यांच्यातील विसंवादामुळेही एकटेपणा वाढतो.
5) बदलती जीवनशैली, व्यायाम, वाचनाचा अभाव, डायटमध्ये बदल, मोबाइल, लॅपटॉपचा अतिवापर
6) सोशल मीडियावर हजारो मित्र असतात, पण प्रत्यक्षात त्यांची संख्या कमी असते.
7) आभासी दुनियेत रममाण झालेल्या विद्यार्थ्याला ताणतणावाच्या परिस्थितीत प्रत्यक्ष मदत मिळत नाही.