नांदेड - कोरोना विषाणूच्या थैमानामुळे देशात लॉक डाऊन सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित व संशयित रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता २१ दिवसाचे लॉक डाऊन आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद पडल्याने बेरोजगार झालेल्या गोरगरीब नागरिकांना उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत माहुरच्या आनंद दत्त धाम आश्रम उर्फ दत्ता महाराज वसमतकर मठाचे मठाधीश साईनाथ महाराज बितनाळकर यांनी आश्रमातील धान्याचे गोदामातील ५० व्किंटल धान्य नागरिकांना वाटप करून मदतीचा हात दिला आहे.
माहूर शहरातील १ हजार नागरिकांसाठी तांदूळ, डाळ, साखर, साबण, मीठ, तिखट आदिसह अन्य जीवनाश्यक वस्तूच्या किट तयार करण्यात आल्या. शहरातील प्रत्येक वार्डाचे नगरसेवक व प्रमुख पुढारी यांना विश्वासात घेऊन अत्यावश्यक गरजू नागरिकांची माहिती घेऊन सर्व वार्डातील गरजुना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. शहरातील सर्व वार्डामध्ये आवश्यकतेप्रमाणे जीवनावश्यक साहित्याच्या कीट गरजू नागरिकांपर्यंत सोशल डीस्टन्स राखत पोहचविण्याची सूचना मठाधीश साईनाथ महाराज यांनी केली. महाराजांच्या सुचनेप्रमाणे सर्व नगरसेवक व स्वयंसेवकांनी आपआपल्या वार्डातील गरजू नागरिकापर्यंत त्या वस्तू पोहचवल्या.
जीवनाश्यक साहित्याच्या कीट तयार करण्यासाठी मठाचे सेवेकरी भाऊराव पाटील हडसनीकर, विलास पाटील रोही पिंपळगावकर, गजानन कलाने व इतर सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. मठाच्या सेवेकरींनी नियोजन करून सोशल डीस्टन्सचे पालन करत शहरातील जवळपास ५० टक्के कुटुंबापर्यंत जीवनाश्यक साहित्याचे वाटप केले. नागरिकांना लॉकडाऊनचे पालन करण्याच्या तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलीस बांधवांना व प्रशासनास सहकार्य करून आपल्या कुटुंबाचे व देशाचे रक्षण करा असा उपदेश साईनाथ महाराज यांनी भक्तांना दिला.