नांदेड - शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु श्री गुरु नानक देव जी यांच्या ५५० व्या जन्मोत्सवानिमित्त निघालेली यात्रा १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास नांदेड शहरातील कौठा गुरुद्वारा भागात पोहोचली. यावेळी हजार भाविकांनी 'बोले सो निहाल, सत श्री अकाल' असा जयघोष तसेच फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करुन जल्लोषात यात्रेचे स्वागत केले. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी आरती करण्यात आली.
हेही वाचा - हिंदीची सक्ती करावी असे म्हणलोच नव्हतो, अमित शाहांची कोलांटउडी
गुरुनानक यांची ५५० जयंती १२ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. यानिमित्ताने दि. १ ऑगस्ट पासून पाकिस्तान देशातील गुरुजींचे जन्मस्थान श्री नानकाना साहिब येथून विशेष धार्मिक यात्रा निघाली आहे. ही यात्रा देशभ्रमण करीत १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता कौठा गुरुद्वारा भागात पोहोचली. यावेळी गुरुद्वारा मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघ आणि पंजप्यारे साहिबान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स.भूपेंद्र सिंग मिनहास यांनी पालखी वाहनाचे स्वागत करीत श्री गुरुग्रंथ साहिबांना वस्त्र भेट दिली.
हेही वाचा - चक्क... वाहतूक मंत्र्यांच्याच गाडीची बनवली बनावट पीयुसी
यावेळी सचिव स.रवींद्रसिंघ बुंगई, परमज्योतसिंघ चाहल, गुरुचरण सिंह घड़ीसाज, स.गुरमीतसिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, जगबीर सिंघ शाहू, सरदुलसिंघ फौजी, शेरसिंघ फौजी, अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी स. डी. पी. सिंघ, वरिष्ठ सहायक अधीक्षक रणजीत सिंह चिरागिया, ठाणसिंग बुनाई, हरजीतसिंघ कडेवाले, नारायणसिंघ नंबरदार, रवींद्रसिंघ कपूर, अवतारसिंघ पहेरेदार, बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते व हजारो भाविक उपस्थित होते.
हेही वाचा - जीव गेला तरी नाणार रिफायनरी होऊ देणार नाही; ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
यात्रेत पालखी वाहनात श्री गुरु ग्रंथ साहिब, श्री गुरु नानकदेवजींचे खडावे, तराजूचे माप आणि ऐतिहासिक शस्त्रे ठेवण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करीत यात्रेचे स्वागत केले. तसेच फटाक्यांची आतषबाजीही केली. नंतर ही यात्रा कौठ्यातून 'बोले सो निहाल, सत श्री अकाल'च्या जयघोषात जुना मोंढा मार्गे गुरुद्वारात रात्री उशिरा पोहोचली. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करीत लंगर मधून प्रसाद, पिण्याचे पाणी, शरबत वाटप करण्यात आले. अनेक मंडळांनी भजन कीर्तनही केले. ही यात्रा रात्री गुरुद्वारा परिसरात मुक्काम करुन गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी नांदेडहून औरंगाबादकडे रवाना होणार आहे. रात्री गुरुद्वारा परिसरात या यात्रेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.