नांदेड- बैसाखीनिमित्त अमृत संचार करावाच लागेल अन्यथा आम्ही आपल्याला निवासस्थानाच्या खाली उतरू देणार नाही, अशी धमकी येथील जगप्रसिद्ध गुरुद्वाराचे पुजारी संतबाबा कुलवंतसिंघजी यांना देण्यात आली. याप्रकरणी २० ते ३० लोकांच्या जमावाविरुद्ध वजिराबाद पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..
येथील जगप्रसिद्ध गुरुद्वारामध्ये बैसाखी निमित्त पूजापाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु, सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळात लोक जमू नयेत आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी फक्त पूजापाठ करण्यास संमती दिली. भाविकांना जमू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संतबाबा कुलवंतसिंघजी हे आपली नित्य पूजा आटोपून निवासस्थानाकडे जात असताना, कुणालसिंघ नंबरदार, सरताजसिंघ सुखमणी, नानकसिंघ बाबूसिंघ यांच्यासह २० ते ३० जणांच्या जमावाने त्यांना अडवले.
'बाबाजी कल सुबह गुरुद्वारा अमृत संचार आपको करना ही होगा. अगर आप ये नही करेंगे तो हम आपको आपके निवासस्थानके निचे उतरने नही देंगे' असे म्हणून धमकावून सरकारच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला विरोध केला. तसेच शिख समाजाच्या धर्मगुरूंच्या आदेशाची अवहेलना केली. अशी तक्रार गुरूद्वारा सचखंड बोर्डाच्या अधिक्षकांनी वजिराबादच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वजिराबाद पोलिसांनी सांगितले.