नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड येथे भारतीय जनता युवा मोर्चाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यातील सोशल डिस्टन्सवरून काँग्रेस आणि भाजपमधील पॉलिटिकल डिस्टन्सी वाढली आहे. शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमावर कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवत महामारी कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. तसेच खासदारासह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही कॉंग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
काँग्रेसने तक्रार दाखल केल्यानंतर भाजपनेही आपली प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सामाजिक काम काँग्रेसच्या डोळ्यात खुपत असून काँग्रेसची अवस्था ही 'नाचता येईना अंगण वाकडं' अशी झाल्याचे भाजपने म्हटले आहे. कोरोनाच्या महामारीत काँग्रेस आणि भाजपच्या या 'राजकीय डिस्टन्स' ची चर्चा मात्र जिल्ह्यात होऊ लागली आहे.
काँग्रेस व शिवसेनेकडून जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात-सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवत महामारी कायद्याचे उल्लंघन करणारे खासदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच रक्तदान शिबिराचे संयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलोकर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विश्वभर पवार, शहरप्रमुख सचिन चंद्र यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रपान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भाजपच्यावतीने मुदखेड येथील गणपती मंदिरात मंगळवार १६ जूनला रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी रक्तदान करणारे कमी व हौशी लोक जास्त अशी स्थिती होती. हे रक्तदान शिबीर बेकायदेशीर होते. तसेच हौशी लोकांची गर्दी झाल्याने अन्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पाटील गोजेगांवकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
काँग्रेसची तक्रार म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडं'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात रक्ताचा तुटवडा असताना भारतीय जनता युवा मोर्चा रक्तदान शिबिर घेऊन या सामाजिक कार्यात हातभार लावत आहे. खरंतर अशा कामाचे काँग्रेसने स्वागत करायला हवे होते. पण स्वतः ही काही करायचे नाही आणि दुसऱ्याने काही चांगले केलेलं काम त्यांच्या डोळ्यात खूपत आहे. काँग्रेसने केलेली ही तक्रार म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडं' अशीच म्हणावी लागेल अशी प्रतिक्रिया भाजपचे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांनी दिली आहे.
यावेळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात निलेश देशमुख यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या संकटात आज संपूर्ण जिल्ह्यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जमेल त्या परीने विविध माध्यमातून सामाजिक कामात हातभार लावत आहे. या कामाची राज्यासह देश पातळीवर नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावर रक्तदान शिबिर घेऊन दोन हजार बाटल्या संकलित करण्याचा संकल्प आहे.
मुदखेड येथेही आम्ही त्याच अनुषंगाने हे शिबीर घेतले आहे. अशा या चांगल्या कामाचे खरंतर स्वागत करायला पाहिजे होते. येथील काँग्रेसने आपल्या स्वभावाप्रमाणे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक काम करतानाही आम्ही सर्व शासनाचे नियम पाळूनच हा कार्यक्रम घेतला. आमचा हेतू स्वच्छ होता हे जनता ओळखून आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तक्रारीला भाजपच्या दृष्टीने तेवढं आम्ही महत्व देत नाही. काँग्रेसनेही दुसऱ्याच्या चुका शोधत बसण्यापेक्षा तेवढाच वेळ सामाजिक कार्याला देऊन राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा असा सल्लाही निलेश बारडकर यांनी यावेळी दिला.