नागपूर - 'फ्री फायर' गेम खेळण्याच्या नादात तीन अल्पवयीन मुले घर सोडून निघून गेल्याचा प्रकार झाला आहे. हे राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलांची शोधाशोध केली असता, तिघेही मुंबईला निघाल्याचे समोर आले. आरपीएफच्या मदतीने या मुलांना मुंबईला जाण्यापासून रोखण्यात आले. ही तिन्ही मुले नागपुरातील गोपाल नगर भागात राहतात. कोरोनाच्या काळात सोबत अभ्यास करण्याचे कारण देऊन ही तीन मुले गेम खेळत असत. शनिवारी पहाटे हे घराबाहेर जॉगिंगला जातो असे सांगून निघाले होते. सकाळी 10 वाजेपर्यंत ते घरी परत न आल्याने पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. तिघांच्या पालकांनी एकमेकांशी संपर्क साधला असता, तिघेही एकत्र निघून गेल्याचे समोर आले.
हा इतर व्हिडिओ मोबाईल गेम प्रमाणे एक गेम आहे. यात 50 जण एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने सोबत खेळू शकतात. यात सहभागी होणारा खेळाडू हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खाली उतरतो. यात तो इतरांना मारून स्वतःचा बचाव करतो. शेवटी जो जिवंत राहील तो गेमचा विनर असतो. आकर्षक पद्धतीने गेमची रचना असल्याने मुले या व्हर्चुअल जगाला भारावून जातात. अल्पवयात नको ते निर्णय घेतात. दुष्परिणाम म्हणून काहींनी आपला जीव गमावला आहे.
पालकांपुढे नवीन संकट -
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आता काही अंशी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातही ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात मोबाईल फोन देणे पालकांना भाग आहे. मुले अभ्यासाव्यतिरिक्त गेम खेळणे, इंटरनेटवर सर्फिंग करणे, यासारख्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. त्यामुळे पालकांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे.