नागपूर : शहरातील राजीवनगरजवळ दोन तरुणांवर 7 ते 8 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. लता मंगेशकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
7 ते 8 जणांकडून दोघांवर हल्ला : मिळालेल्या माहितीनुसार, राकेश मिश्रा (27) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रवी जयस्वाल हा तरुण जखमी आहे. राकेश मिश्रा रवी जयस्वाल हे दोघे मित्र असून ते रात्री साडेनऊच्या सुमारास राजीवनगर येथील पान टपरीवर बसले होते. त्याचवेळी कारमधून 7 ते 8 अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी आले आणि दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. दरम्यान हे दोघेही आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करायचे. ते दररोज सायंकाळी बसस्टॉपवर येऊन बाजूला असलेल्या एका टपरीवर बसायचे. बुधवारी रात्री टपरीवर बसलेले असताना कारमधून 7 ते 8 जण त्यांच्याकडे आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. या दोघांच्याजवळ येताच त्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात राकेश मिश्राचा जागीच मृत्यू झाला.
दुसरा गंभीर जखमी : हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात राकेशचा जागीच मृत्यू झाला. तर रवीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला जखमी केले. हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर रवी जीव वाचविण्यासाठी बाजूला असलेल्या महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये लपला. काचेचे केबिन हे आतून बंद केले. परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि काचेचे केबिन फोडत त्यांनी क्लिनिकमध्ये प्रवेश केला. हल्लेखोरांनी तेथील रुग्ण आणि डॉक्टरांच्या समोरच रवीला गंभीर जखमी केले. त्यानंतर सर्व आरोपी कारमध्ये बसून पसार झाले.
तपास सुरू : या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर रवी मिश्राचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रवी व राकेशवर हल्ला कुणी आणि कोणत्या कारणाने केला, याचा उलगडा पोलिसांना झालेला नाही. या हल्ल्यामागील सूत्रधार कोण आहे हे शोधण्यासाठी पोलिसांना तपास सुरू केला आहे.
हेही वाचा-