नागपूर - ऊर्जा मंत्रालयाला निधी मिळत नसल्याची तक्रार राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ( Energy Minister Dr. Nitin Raut ) यांनी केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशात आता काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मंत्रालयांनाच निधी कमी दिला जात असल्याचा सूर मंत्र्यांमध्ये उमटू लागला आहे. यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur at Nagpurt Airport ) यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, निधी मिळवण्याची मागणी मी आक्रमकपणे रेटून धरत असते. त्यामुळे मला अद्याप तरी तसा अनुभव आलेला नाही. अर्थमंत्री अजित पवार ( Finance Minster Ajit Pawar ) आक्रमक असले तरी ते स्वभावाने मवाळ आहेत. आम्ही हट्ट केला की निधी मिळतो. यानंतर जरी काही अडचण आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आमचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
ऊर्जामंत्रालयाला अर्थ व नियोजन मंत्रालयाकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना पत्र लिहून परिस्थितीची माहिती उपलब्ध करून दिली आहे. नितीन राऊत यांनी लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मंत्रालयांना निधी वाटपात डाववले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
आर्वी प्रकरणाची माहिती पोलिसांना नसणे धक्कादायक -
अल्पवयीन मुलीच्या गर्भपातानंतर उजेडात आलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणाची माहिती पोलिसांना नसणे अत्यंत धक्कादायक आहे, असे मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने जी कारवाई करायची होती. ती कारवाई आम्ही केली असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
चंद्रकांतदादा कशावरही बोलू लागले -
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हल्ली कोणत्याही विषयावर बोलू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.