मुंबई - वांद्रे बसस्थानक परिसरात झालेल्या जमाव प्रकरणातील उत्तर भारतीय आरोपी विनय दुबेला 21 एप्रिलप्रर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्रे बसस्थानकात संचार बंदीचा कायदा मोडत जमाव जमवण्यामागे विनय दुबेचा हात असल्याच्या आरोपाखाली वांद्रे पोलिसांनी त्यास अटक केली होती. विनय दुबेला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यास न्यायालयाने 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
![violence at bandra bus stand; accused vinay dubey got police custody](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-04-15-bandra-7201159_15042020141124_1504f_1586940084_579.jpg)
मंगळवारी मुंबईतील वांद्रे परिसरात 1500 जणांचा जमाव अचानक जमला होता. याची चौकशी करणे बाकी आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विनय दुबे हा सोशल माध्यमांवर लॉकडाऊनच्या विरोधात चिथावणीखोर भाषण देऊन परप्रांतीय मजुरांना भडकविण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे? हे तपासणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले आहे.
हेही वाचा - वांद्र्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, 'त्या' लोकांची व्यवस्था सरकारने करावी - विरोधी पक्षनेत्यांची विनंती
काय आहे प्रकरण?
लॉकडाऊन काळामध्ये मंगळवारी मुंबईतील बांद्रा बसस्थानक येथे जमलेल्या जवळपास 1500 लोकांचा जमाव पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगवला होता. त्यानंतर यासंदर्भात जवळपास 1 हजार जणांच्या विरोधात कलम 188 खाली गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विनय दुबे या आरोपीला अटक केली आहे. विनय दुबे हा मजुरी करणाऱ्या कामगारांच्या उत्तर भारतीय महासंघाचा अध्यक्ष आहे. त्यांने फेसबुक वर 18 एप्रिल रोजी गावी जाण्यासाठी बस स्थानकाजवळ जमायचे आहे, असे आवाहन करणारी पोस्ट केली होती. विनय दुबे याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह करून बांद्रा बस स्थानकाजवळ आंदोलन करण्यासाठी एकत्र येण्याचा आवाहन सुद्धा केले होते. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली परिसरातून विनय दुबे याला ताब्यात घेऊन त्यास मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.