मुंबई - ज्येष्ठ लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचे कोरोनामुळे आज पहाटे निधन झाले. मुंबई येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
छगन चौगुले हे एक लोककलावंत म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांचे कला सादर करण्याचे कौशल्य अफलातून होते. मुळात ते जागरण करणारे गोंधळी होते. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही जारण गोंधळाच्या कार्यक्रमांतून झाली. केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिले. त्यामुळे महाराष्ट्राला एक नवा लोककलावंत मिळाला होता, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे यांनी दिली.
छगन चौगुले यांनी 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यांसारखे कार्यक्रम सादर केले. खंडेरायाची गीते, बाळू मामाची कथा, अंबाबाईची कथा, कथा भावा भावाची, कथा बहीण भावाची अशा लोककथांच्या त्यांच्या अनेक कॅसेट प्रसिद्ध होत्या. पुढे त्यांनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले.
छगन चौगुले या नावाला विशेष ओळख मिळवून दिली ती 'खंडेरायाच्या लग्नाला बानू, नवरी नटली अन् काल बाई सुपारी फुटली' या गाण्याने. आजही अनेक टीव्ही शो, शाळा महाविद्यालयांचे युवा महोत्सव आणि विविध कार्यक्रमांत 'नवरी नटली' हे गाणे वाजवले जाते. २०१८ साली त्यांना मानाचा लावणी गौरव पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या जाण्याने एक चांगला लोककलावंत हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.