मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार विरोधात निघालेल्या लाल बावट्याच्या एल्गाराला शमविण्यात कसेबसे यशस्वी झालेल्या फडणवीस सरकारला आता आदिवासींच्या एल्गाराचा सामना करावा लागणार आहे. भाजप सरकारने राज्यातील धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू केल्याने आदिवासी समाजात नाराजी पसरली आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी उद्या (गुरुवार) नाशिक येथून मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपने धनगरांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील चार लोकसभा आणि २५ विधानसभा मतदारसंघात आदिवासींकडून सरकारला इंगा दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण लागू करू, असे आश्वासन भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. त्यामुळे मराठा समाजापाठोपाठ आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने सरकारवर दबाव वाढवला होता. भाजपने मराठा समाजाला लागू केलेले १६ टक्के आरक्षण न्यायालयात अडकले असताना निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाला खूश करण्यासाठी भाजप सरकारने ‘टिस’च्या अहवालाच्या आधारे आदिवासींच्या सामाजिक व शैक्षणिक सवलती या धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय २ मार्चला घेतला आहे.
धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास राज्यातील आदिवासींचा तीव्र विरोध असतानाही भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आदिवासींमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात आदिवासींनी एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला असून, धनगर समाजाला लागू केलेल्या सवलती रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्या नाशिकमधून लाँग मार्च काढला जाणार आहे.
नाशिक ते मुंबई असा हा लाँग मार्च असून तो मंत्रालयावर धडकणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा लाँग मार्च सर्वपक्षीय आहे. भाजपसह, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनाही त्यात सामील करून घेतले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा भाजपची कोंडी होणार असून भाजप या लाँग मार्चला कसे थोपवतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)