मुंबई - राज्यातील माजी सैनिकांना आणि त्यांच्या विधवांना मालमत्ता कर आणि घरपट्टी अधिकारांमध्ये माफी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. यासाठी एका नवीन योजनेची घोषणाही करण्यात आली आहे.
राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस 'दिवंगत बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना' असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे.
मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करून त्याला 'मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना' असे नाव देण्यात आले असून यामुळे नागरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून देखील सूट मिळणार आहे.
हेही वाचा - दहिसर येथील कोरोना सेंटरमध्ये आग; प्रसंगावधान राखल्याने आग आटोक्यात
हेही वाचा - मुंबईकरांना दिलासा..! दुप्पट ते पाचपट पाणीपट्टी दरवाढ स्थायी समितीने रोखली