मुंबई- सध्या ही टीका करण्याची वेळ नाही माणुसकीची वेळ आहे, टीका करायला आयुष्य पडलेले आहे. केंद्र सरकारने सोमवारी आमच्या वेतनात कपात केली. त्यांचे मी स्वागत करते. परंतु, राज्यातील सर्व खासदारांचा निधी आपल्याकडे वळवला. तो महाराष्ट्राला परत मिळणार का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुल लाईव्हच्या माध्यमातून केला.
हेही वाचा- 'बिग बीं'नी शेअर केली ९ वाजून ९ मिनीटांची 'फेक' सॅटेलाईट इमेज, नेटकऱ्यांचा संताप
आज त्यांनी फेसबुक लाईव्हवरुन संवाद साधत केंद्र सरकारने राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचा निधी आपल्याकडे वळविल्याने त्याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, आम्हाला मिळत असलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीत आम्ही आपल्या मतदार संघातील आणि राज्यातील विकास कामे, पायाभूत सुविधांचे कामे करतो. परंतु, केंद्राने राज्यातील सर्व खासदारांचा निधी का वळवला. याविषयी मनात शंका येते. यामुळे उद्या ते आमच्याशी बोलतील तेव्हा आम्ही यावर विचारणार असल्याच्या त्या म्हणाल्या.
राज्याला एकीकडे केंद्राकडून येणारा जीएसटीचा परतावा मिळालेला नाही. आम्ही कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहून केंद्राकडे आर्थिक पॅकेजची मागणी करतोय, परंतु, त्यावर कोणताही निर्णय केंद्राने घेतला नाही. यामुळे त्याचे स्पष्टीकरण पंतप्रधानानी करावे अशी मागणीही सुळे यांनी केली. तसेच ही राजकरणाची वेळ नाही. संकटावर मात कशी करता येईल ही वेळ आहे. खोट्या बातम्या येतात, द्वेष हा माझा स्वभाव नाही. पण लोकांबद्दल चुकीचे माहिती देणे आणि समाजात तेढ निर्माण करणे. या मानसिकतेचा मी निषेध करते.
देशाच्या आधी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकारचे मी आभार मानते. आपल्या सरकारने संवेदनशिलता दाखवली. लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर न पडणे हेच हिताचे आहे. त्यामुळे लोकांनी घरातच राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. मला कधीही बोअर होत नाही. तो मनाचा खेळ असतो असेही त्या म्हणाल्या. आपण दिवसभरात काय नियोजन करतो, कोणते चित्रपट पाहतो, कोणते ॲप डाऊनलोड करुन ते शिकतोय, आदींचीही माहिती सुळे यांनी संवादादरम्यान दिली.
राज्यात आपण मरकझला परवानगी दिली नाही. त्याचा मला अभिमान वाटतो. परंतु, दिल्लीमध्ये ज्या दोन गोष्टी झाल्या त्या मनाला वेदना देतात. दिल्लीत ट्रम्प आल्यास दंगल झाली. तेव्हा तेथील पोलीस आयुक्त काय करत होते? आणि निझामुद्दीन येथील मरकझला त्याच पोलीस प्रशासनाने कशी परवानगी दिल्ली. यामुळे दिल्लीचे पोलीस प्रशासन काय करत होते? असाही सवाल केला. ही टीका करण्याची वेळ नाही माणुसकीची वेळ आहे. टीका करायला आयुष्य पडलेले आहे, असेही त्या म्हणाल्या. राज्यातील अनेक प्रश्नांवर मी स्वत: लक्ष घालून काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.