मुंबई- सुधारित नागरिकत्व संशोधन कायदा 2019 च्या विरोधात देशभर विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने परिसरातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन परिपत्रक काढले आहे. यात देशविरोधी व समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : कर संकलनात मोठी घट झाल्याने निर्मला सीतारामन यांच्या समोर आव्हान
देशभरामध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात विविध नामांकित विद्यापीठातील व संस्थेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन, मोर्चे, काढले आहेत. आयआयटीतील विद्यार्थ्यांनीही परिसरात आंदोलन केले होते. आंदोलनामुळे शैक्षणिक वातावरणात तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आंदोलन, मोर्चा तथा वसतीगृह परिसरात कोणतेही मजकूर, चित्रफीत प्रदर्शित करण्यात येऊ नये, याकरिता आयआयटी प्रशासनाने सर्वच विद्यार्थ्यांना मंगळवारी इमेल पाठवले आहेत. यात 15 नियमांचा समावेश असलेली नियमावली जारी करण्यात आली आहे.
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये भाग घेऊ नये, विद्यार्थ्यांच्या कोणत्याही कृत्याने शांतता भंग होणार नाही. याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी, असे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. या पत्रकाची विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. आता विद्यार्थी कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.