मुंबई- मध्य रेल्वेकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशासाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली तर तर, 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना मर्यादित वेळेसाठी लोकल प्रवास सुरु करण्यात आली आहे. मात्र, यावेळी 2 लाख 38 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. यातून मध्य रेल्वेने 7 कोटी 61 लाखांचा दंड वसूल केला आहे.
अशी केली रेल्वे कारवाई-
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 15 जून 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणीच्या मोहीम राबवली. या तपासणी दरम्यान 2 लाख 38 हजार फुकटे प्रवास आढळून आले असून त्यांच्या पासून 7 कोटी 61 लाख रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे 1कोटी 75 लाख प्रकरणे उपनगरी भागात आढळून आली ज्यात दंड म्हणून 5 कोटी 10 लाख वसूल केले आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील 63 हजार प्रकरणांमधून 2 कोटी 51 लाख रुपये दंड वसूल करण्यात आले.
वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन-
उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहीमे दरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे व्युत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.