मुंबई - दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील सी ग्रीन या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. यानंतर याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येईल. तसेच या पथकामार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (मंगळवारी) सभागृहात दिली.
काय म्हणाले गृहमंत्री?
मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि त्यांचे पुत्र अभिनव मोहन डेलकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी प्रफुल खेडा यांच्यावर आरोप केले आहेत. माझे वडील गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक प्रशासक प्रफुल खेडा यांच्यामुळे दबावात होते, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. गृहमंत्री म्हणाले, त्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केली याचा अर्थ त्यांचा महाराष्ट्राच्या प्रशासनावर विश्वास आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी करण्यात येईल. याचबरोबर छत्तीसगडच्या रायपूरमध्ये असलेले आयएएस अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनीही नागपूरमध्ये आत्महत्या केली. त्यांना महाराष्ट्रात न्याय मिळेल या उद्देश्याने त्यांनी महाराष्ट्रातील नागपुरात आत्महत्या केली असावी, असेही गृहमंत्री अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले. सर्वांना माहितीये की महाराष्ट्रात न्याय मिळतो.
डेलकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -
आज संपूर्ण डेलकर परिवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या जिवाला धोका आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. याप्रमाणे आम्ही त्यांना संरक्षण देत आहोत आणि या प्रकरणाची चौकशी एसआयटीतर्फे करणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ
सुसाईड नोट -
आत्महत्या करण्याच्या अगोदर मोहन डेलकर यांनी सहा पानांची गुजराती भाषेत सुसाईड नोट लिहिलेली होती. या सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हेवेलीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू असल्याचा उल्लेख आढळून आला आहे. आपण या अधिकाऱ्यांशी चर्च करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे अधिकारी आपलं ऐकूण घेत नव्हते, असाही उल्लेख या सुसाईड नोटमध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दादरा नगर हवेलीचे काही प्रशासकीय अधिकारी आणि डेलकर यांच्यामध्ये वाद सुरू होते, आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अन्य काही बाबिंचा देखील उल्लेख केला आहे. खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून, आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. डेलकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा - भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांची आत्महत्या - राऊत