यंदाची शिवजयंती हजारोंच्या साक्षीने, सरकारने अडवून दाखवावं - मराठा क्रांती मोर्चा - Maratha Kranti Morcha
यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या सावटामुळे राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर अनेक निर्बंध घातले. यावरच विरोधकांनी सडकून टीका केली. त्यातच मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यांनी सरकारला थेट सवाल विचारला आहे की, पक्षाच्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी ही शासनाला मान्य आहे आणि शिवजयंतीला फक्त 100 व्यक्ती हजर राहू शकतात हा कुठला न्याय आहे, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केला आहे.

मुंबई - दरवर्षी 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. पण, यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या सावटामुळे राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर अनेक निर्बंध घातले. यावरच विरोधकांनी सडकून टीका केली. त्यातच मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यांनी सरकारला थेट सवाल विचारला आहे की, पक्षाच्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी ही शासनाला मान्य आहे आणि शिवजयंतीला फक्त 100 व्यक्ती हजर राहू शकतात हा कुठला न्याय आहे, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केला आहे.
शिवजयंतीवरच निर्बंध लादले
मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन शिवजयंती संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अंकुश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितल की, आज वंदनीय बाळासाहेब असते तर त्यांना ही उध्दव ठाकरे हे आपले पुत्र असल्याची शरम वाटली असती. शिवगर्जना देऊन शिवसेनेची स्थापन केली होती खरी मात्र मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी चक्क शिवजयंतीवरच निर्बंध लादले आहेत, अशा सरकारचा मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करत आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या यात्रेला हजारो कार्यकर्ते
शिवजयंतीवर निर्बंध परंतु चरित्रहिन मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी जेसीबी लावून हजारो कार्यकर्ते स्वागत करतात. त्याला परवानगी मिळते. तर शिवजयंतीसाठी केवळ शंभर जणांची मर्यादा आणली मात्र राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला हजारोंच्या संख्येने सभा घेतली होती. शिवजयंतीला संख्येची मर्यादा दिली जात आहे. परंतु काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या शक्ती प्रदर्शनाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आले होते तेव्हा कोरोना कुठे गायब झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठा क्रांती मोर्चाची मिरवणूक
हा दुटप्पीपणा सरकार का करत आहे हा आमचा सवाल आहे? आम्ही सरकारला जाहीर आव्हान करत आहोत आहे त्यांनी ते स्वीकारावे संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार, तसेच मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्या माध्यमातून शिवसेना भवन ते सिल्वर ओक आणि वर्षा बंगाला या मार्गाने ट्रॅक्टरवरून शिवजयंती मिरवणूक काढणार आहेत. सरकारने रोखून दाखवावे, असा इशारा देत आहोत असेही अंकुश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा - चेन्नईत रोहित 'हिट'..! शतकासह रचले अनेक विक्रम