मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपने ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवरील चित्रप्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.शिवसेना नेते दिवाकर रावते, संजय राऊत, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत उपस्थित आदी नेते उपस्थित होते.
संघाला आता 100 वर्ष पूर्ण: उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला हे बरे झाले. सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. राहुल गांधी यांच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात कधीच सहभाग नव्हता, अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये, अशा शब्दांत भाजपला कानपिचक्या दिल्या. तसेच पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे अधिकार असताना, 8 वर्षात भारतरत्न पुरस्कार का दिला नाही? असा जाब ही विचारला. स्वातंत्र्य लढ्यात संघ नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? अशा प्रश्नांची सरबत्ती केली.
बाजारूपणा करू नये: लढता, लढता दहा वर्षे पूर्ण झाली. आज दहावा स्मृतिदिन आहे. महापौर बंगल्यात लवकरच स्मारक होईल. फटकारे व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. व्यंगचित्र उपलब्ध करून घ्या, दर्शन घेता येईल. मात्र, बाळासाहेब ठाकरे समजायला आज काहींना 10 वर्षे लागली. बाळासाहेबांविषयी प्रेम आणि भावना व्यक्त केली पाहिजे. फक्त त्याचा बाजार करू नये. बाजारूपणा करू नये. कृती असावी. विचार असावा. बाजार कोणी मांडू नये. प्रेम श्रद्धा समजू शकतो. त्यांना साजेसं काम करावे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. तसेच सिनेमावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.
देशाची लोकशाही धोक्यात: भाजप सगळीकडे ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण द्यायचा की नाही देशातील जनतेचा निर्णय आहे. लोकांच्या मनातील मांडे खाण्याचा भाजप नेहमीच प्रयत्न करत आली नाही आहे. आज देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. आपण गुलामगिरीकडे वाटचाल करतो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे संविधान धोक्यात आले आहे. ते वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होत आहे. त्यामुळे जिवंत अनुभव स्मारकात पाहता येणार आहे. त्याचे सादरीकरण झालं. व्यंगचित्रकार ही बाळासाहेबांची ओळख होती. बाळासाहेबांवरील चित्रं आणि व्यंगचित्रं असतील तर उपलब्ध करून द्या, असे आवाहन देशातील व्यंगचित्रकार, चित्रकारांना उद्धव ठाकरे यांनी केले.
फडणवीस यांचा बदला दिल्लीने घेतला: शिवसेनेचा बदला घेतल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती यावरही उद्धव ठाकरे यांनी परखड भाष्य केले. जन्म मुख्यमंत्री होईल असं वाटत होतं, त्यांना केंद्राने उपमुख्यमंत्री करत बदला घेतला असा टोला फडणवीस यांना ठाकरेंनी लगावला. तसेच संभाजीनगरमधील महिला अत्याचार विरोधात शिंदे- फडणवीस सरकारला फटकारले. मंत्रीच महिलांचा आदर ठेवत नाहीत. आता यांचे हिंदुत्व गेले कुठे, असा सवाल शिंदे गटाला विचारला. शिवतीर्थावरील गोमूत्र शिंपडण्याचे समर्थन करत नसल्याचेही ठाकरे म्हणाले.