मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता तयारीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह सर्वच नेते वेळोवेळी मध्यावधी निवडणुकांचे संकेत देत आहेत. मध्यावधी निवडणुका लागल्यास त्यादृष्टीने देखील मनसे तयारी करत असल्याचे पाहायला मिळतेय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याच पार्श्वभूमीवर 23 तारखेला महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असून, 27 तारखेला राज्यातील उर्वरीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता असतानाच मनसेचे नेते व सरचिटणीस यांनी 'सबका हिसाब होगा' अशा आशयाचे ट्विट केल्याने आता चर्चांना सुरुवात झाली आहे.
गढूळपणावर राज ठाकरे तुरटी फिरवतील -देशपांडे यासंदर्भात बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) म्हणाले की, 23 तारखेला सर्व महिला गटाध्यक्षांचा मुंबईत मेळावा होईल. त्यानंतर 27 तारखेला उर्वरित गटाध्यक्षांचा मेळावा मुंबईतील नेस्को येथे पार पडेल. या दोन्ही मेळाव्यांना स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करतील. सध्या राजकारणात जो काही गढूळपणा आला आहे त्यावर तुरटी फिरवण्याचं काम राज ठाकरे करतील. 27 तारखेच्या मेळाव्यात सबका हिसाब होगा. अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
सामानात आता फक्त राऊतांची वळवळ -देशपांडे शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामना (Samana Newspaper) या वृत्तपत्रामध्ये वाढवण बंदरासंदर्भात एक जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीवरून संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. देशपांडे म्हणाले, सामनाची दुटप्पी भूमिका दुसऱ्यांदा समोर आली आहे. पहिल्यांदा त्यांनी शिंदे सरकारची जाहिरात देऊन आपली दुटप्पी भूमिका जाहीर केली होती.
ज्या एकनाथ शिंदेंना हे 50 खोके म्हणतात जे सरकार असंविधानिक आहे असं म्हणतात त्याच सरकारची सामनात जाहिरात येते. आता तर शिवसेना ज्या वाढवण बंदराला विरोध करतेय, लोकांची सहानभूती मिळवतेय, त्याच वाढवण बंदराची जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही दुटप्पी भूमिका आहे. जे दैनिक सामना बाळासाहेबांनी एक चळवळ म्हणून सुरू केलं ते आता चळवळ राहिली नाही. ती आता फक्त संजय राऊत यांची वळवळ सुरू आहे. असा टोला देशपांडे यांनी लगावला.