मुंबई Ramakant Acharekar News : माजी क्रिकेटपटू तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासारखे क्रिकेटपटू घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून रमाकांत आचरेकर यांना ओळखलं जाते. आता शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर यांच्या आठवणी जपण्यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. ज्या मैदानावर रमाकांत आचरेकरांनी अनेक खेळाडू घडवले, त्या मैदानावर त्यांच्या आठवणी जपल्या गेल्या पाहिजेत, अशी इच्छा मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते.
![Cricket Coach Ramakant Achrekar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10-01-2024/mh-mum-kesarkarmeetrajthackeray-7210570_10012024101632_1001f_1704861992_851.jpg)
क्रिकेटपटू मुलांना कायमस्वरूपी प्रेरणा : भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या आठवणी शिवाजी पार्क मैदानावर जपल्या जाव्यात, अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक क्रिकेट खेळाडू घडवणारे रमाकांत आचरेकर यांची छोटीशी आठवण शिवाजी पार्क मैदानावर राहिली पाहिजे, याबाबत राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. राज ठाकरे यांनी या संदर्भात अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी याबाबत बैठक घेईन आणि लवकरच त्याला मान्यता देईन. अशा संकल्पनेतून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कायमस्वरुपी प्रेरणा भेटत राहील. या संकल्पनेबाबत राज ठाकरे अधिक माहिती देतील" असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
![Cricket Coach Ramakant Achrekar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10-01-2024/mh-mum-kesarkarmeetrajthackeray-7210570_10012024101632_1001f_1704861992_302.jpg)
आमची बाजू सत्याची, त्यामुळे विजय होणार : आजच्या आमदार अपात्रता निकालाबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, "सत्यमेव जयते! आमची बाजू सत्याची असून ती बाजू आम्ही व्यवस्थित मांडली आहे. यावर फार मोठी चर्चा होण्याची गरज आहे. देशात लोकशाही आहे, परंतु पक्षातही लोकशाही असली पाहिजे, असा नियम आहे. जो पक्ष निवडणूक आयोगाकडं आपली नोंदणी करतो, त्या पक्षात लोकशाही असेल, तरच त्याला मान्यता भेटते. बाळासाहेब ठाकरे यांनी जी घटना बनवली, ती बनवताना निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना होत्या, त्या पद्धतीनं लोकशाही पूरक होती. परंतु नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला होता. बदल अशा स्वरुपाचा होता की, आपणच लोकांना निवडायचं आणि त्यांनीच आपणाला निवडून आणायचं, याबाबत निवडणूक आयोगाची मान्यता घेतली गेली नव्हती. म्हणून जेव्हा हे सादर करण्यात आलं, तेव्हा निवडणूक आयोगानं त्यांना नाकारलं आहे. या घटनादुरुस्तीच्या आधारे त्यांनी जे जे निर्णय घेतले, त्याला कुठलाही आधार नाही. म्हणून उद्धव ठाकरे वेळकाढूपणा करत आहेत. मला त्यांच्याबाबत आदर आहे. मराठा आरक्षण संदर्भात कोर्टात कोण गेलं? महापालिका जागे संदर्भात कोर्टात कोण गेलं? हे प्रकरण सुरू झाल्यापासून नेहमी जे अधिकृतपणे बोलायला पाहिजे, तसं न बोलता आपल्याला जे सोयीस्कर असेल, तेच उद्धव ठाकरे बोलत आहेत. यासाठी आम्ही रितसर मार्गानं जात असून आम्ही आमची बाजू मांडली आहे" असंही केसरकर म्हणाले.
हेही वाचा :