मुंबई - 12 ऑक्टोबर 2020 यादिवशी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अचानक वीज गेल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली होती. मात्र, या ब्लॅक आउटमागे विशेष सायबर हल्ला झाल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तवली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमेरिकेच्या रेकॉर्डड फिचर अॅनॅलिसिस कंपनीचा अहवालानुसार, मुंबईत ब्लॅक आऊटमागे चीनचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायबर विभागाकडूनही यासंदर्भात तपास सुरू आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. सायबर विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या साईटवर हल्ले झाले आहेत. मात्र, अद्याप हे हल्ले कोणाकडून करण्यात आले आहेत, यासंबधी गृह विभागाकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. या हल्ल्याचा तपास करताना महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या संकेतस्थळावर आठ जीबी अंकाउंटेड डेटा मिळाला आहे. हा सायबर हल्ल्यात वापरला गेला आल्याची शक्यता गृहमंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबई #Powercut : वीजसेवा पूर्वपदावर; मुख्यमंत्री ठाकरेंचे संबंधितांना 'हे' आदेश
या संपूर्ण घटनेचा आणि हल्ल्याचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल गृह विभागाकडून ऊर्जा विभागाला देण्यात आला आहे. आता ऊर्जा विभागाकडून हा अहवाल तपासला जाणार आहे. 12 ऑक्टोबरला ब्लॅकआउट झाल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामागे संशय व्यक्त केला होता.
मुंबई शहरातील लाखो ग्राहकांना मुंबईबाहेरून वीज तयार करून विविध वीज कंपन्याद्वारे वीज पुरवठा केला जातो. मात्र, 12 ऑक्टोबरला ग्रीड फेलीयरमुळे मुंबईसह बाजूच्या जिल्हयातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. मुंबईत शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी तर भांडुप व मुलुंड येथे एमएसईबी या वीज कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. ही वीज मुंबईबाहेर बनवून या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना पुरवली जाते. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या ग्रिडमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा खंडित झाला. ग्रिड फेल्युअर झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली होती.