मुंबई Mumbai Trans Harbour Link Road : मुंबईतील शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अर्थात मुंबई पार बंदर हा 22 किलो मीटरचा सागरी प्रकल्प 'अटल सेतू' या नावाने लोकार्पणासाठी तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे. मुंबई ते न्हावाशेवा हे दोन तासाचं अंतर अवघ्या वीस मिनिटात या प्रकल्पामुळं पार करता येणार आहे. त्यामुळं अत्यंत वेगवान वाहतुकीसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार असून त्याचा प्रवाशांना मोठा लाभ मिळणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

काय आहे हा प्रकल्प : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग म्हणजेच एमटीएचएल हा अत्यंत जलद आणि अत्यंत महत्त्वाचा असा स्थापत्य अभियांत्रिकी कलेचा देशातील आदर्श नमुना असणार आहे. एकूण 22 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून यापैकी साडेसोळा किलोमीटर भाग समुद्रामध्ये तर साडेपाच किलोमीटर भाग जमिनीवर असणार आहे. या प्रकल्पासाठी 17 आयफेल टॉवर आणि पाचशे बोइंग विमाने इतक्या वजनाच्या लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असून जगातील बाराव्या क्रमांकाचा सागरी सेतू असणार आहे. यासाठी 18000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सागरी सेतूमुळं मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर ही दोन प्रसिद्ध बंदरं जोडली जाणार आहेत. या प्रकल्पामुळं मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसंच मुंबई-गोवा महामार्ग जोडले जातील. त्याचबरोबर प्रवासाचा वेळही निम्म्याहून कमी होईल. अटल सेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला आहे.

भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू मार्ग : या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा भारतातला सर्वात मोठा जमिनीवर, कांदळवनाच्या भागातून जाणारा सागरी मार्ग आहे. अशा प्रकारचे काही सिंगल लॉंगेस्ट सागरी मार्ग आहेत, त्यापैकी हा एक आहे. त्याचं वैशिष्ठ्य असं आहे की तब्बल 22 किलोमीटरचा हा ब्रीज आहे. सध्या या प्रवासासाठी दोन तास लागतात. हा मार्ग सुरू झाल्यानंतर केवळ पंधरा मिनिटांमध्ये मुंबईतला माणूस चिरले रायगडमध्ये पोहोचेल. तिथून हा मार्ग मुंबई पुणेला कनेक्ट करेल. मुंबई गोवालाही कनेक्ट करेल. त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेलला कनेक्ट करेल. त्याचबरोबर आपण इकडे वरळीला कनेक्ट करत आहोत. मरीन ड्राईव्ह कनेक्टर आपण करतोय. त्यामुळं हा सगळ्यात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठरेल. त्याच्यामुळं वेळ वाचणार आहे. तसंच इंधन वाचणार आहे आणि प्रदूषण कमी होणार आहे.

फ्लेमिंगोमध्ये वाढ : यामध्ये अधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्तीची वन क्षमता केअरिंग कॅपॅसिटी जागा आहे त्याचं वजन कमी आहे. त्याचबरोबर इथले फ्लेमिंगो जाऊ नये हा पर्यावरण पूरक प्रकल्प त्यासाठी रिवर सर्कुलेशन ड्रिलचा अत्याधुनिक वापर केला आहे. त्याचबरोबर येथे काम सुरू असताना ध्वनिरोधक वापरण्यात आले. कारण काम करत असताना देखील त्याच्या आवाजाने फ्लेमिंगो कमी होऊ नये हे उद्दिष्ट होते. आजची परिस्थिती फ्लेमिंगो कमी न होता वाढलेले आहेत आणि पर्यावरण पूरक पर्यावरणाचा समतोल राखून हा प्रकल्प केलेला आहे. यामध्ये एवढं स्टील आणि मटेरियल वापरलेलं आहे की, चार हावडा ब्रिज होतील. 17 आयफेल टॉवर तयार झाले असते. दोन वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येईल एवढ्या लांबीची वायर वापरली असल्याचा दावा, मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय. या शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडचा फायदा लाखो लोकांना होणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते होणार अटल सेतूचे लोकार्पण : या अटल सेतू प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला होणार आहे. यामध्ये टोलच्या बाबतीमध्ये शिफारस 490 रुपयाची होती, परंतु मंत्रिमंडळाने सरकारने तो अडीचशे रुपये लोकांना दिलासा मिळण्यासाठी केला आहे. पेट्रोलही कमी लागेल. त्यामुळे 500 ते 700 रुपयाची याच्यामध्ये बचत होते. त्यामुळं हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा प्रकल्प आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय.
हेही वाचा -