मुंबई - सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दारूच्या दुकानाचा परवाना देण्यासाठी अडीच कोटी रुपयांची लाच घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
"चौकीदार ही चोर है" ही घोषणा किती यथार्थ आहे, हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाकडे पाहिल्यावर समजून येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रीमंडळ आहे, की अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी?असा संतप्त सवाल करून मुख्यमंत्री मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर किती पांघरून घालणार, अशी विचारणा करून जराही शरम वाटत असेल तर कांबळे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.
सावंत म्हणाले की, राज्याच्या मंत्र्याने सरकारी निवासस्थानातून आपले हस्तक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या साथीने दारू दुकानाचा परवाना देण्याकरिता २ कोटी १५ लाख रूपये लाच घेतली, अशी तक्रार फिर्यादी विलास चव्हाण (रा. औरंगाबाद) यांनी केली आहे. फिर्यादीने मंत्र्यांची त्यांच्या बंगल्यावर ४ वेळा भेट झाली, यावेळी त्यांनी लाचेची मागणी केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीने मंत्र्यांच्या हस्तकांच्या खात्यात लाचेचे पैसे भरले आहेत. तसेच कांबळेंचे खासगी सचिव मनाळे यांनी ६० लाख रूपये लाचेची रक्कम कांबळेंच्या निवासस्थानी स्वीकारली. फिर्यादीच्या पत्नीच्या मालकीच्या हॉटेल माथेरानच्या बँक खात्यातूनही कांबळेंच्या खात्यावर १० लाख रूपये लाचेची रक्कम वर्ग करण्यात आली. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. न्यायालयाने याची दखल घेऊन सामूहिक गुन्हेगारी अंतर्गत भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२०, १२० ब, ४०६आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने औरंगाबादच्या सिडको पोलीस स्थानकात कांबळे यांच्यासह चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली.
या प्रकरणात फक्त गुन्हा नोंद करून चालणार नाही. तर पोलिसांनी तात्काळ कांबळे यांना अटक केली पाहिजे. अन्यथा ते फिर्यादीवर दबाव आणू शकतात. लाचखोर मंत्र्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री सरकार चालवत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही सावंत म्हणाले.