मुंबई - अँटिलिया प्रकरणाच्या तपासाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरूवात केली आहे. त्यात हिरेन यांचे मित्रही काही दिवसांपासून गायब असल्याचे समोर आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या घरासमोर एका स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने खळबळ उडाली होती.
विरोधकांचा हल्लाबोल -
याप्रकारानंतर ही स्कॉर्पिओ ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांची ही कार चोरी झाल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर अँटिलियासमोर ती स्कॉर्पिओ जिलेटिनच्या कांड्यासमवेत आढळली. दरम्यान, गेल्या आठवड्यात ठाण्यात मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्याने आणखी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. यानंतर थोड्याच वेळात हिरेन यांच्या मृत्यूची बातमी आली. यानंतर विरोधकांनी सरकारला अक्षरश: धारेवर धरले. या प्रकरणाचा तपास सचिन वझे करत होते. त्यांचेसुद्धा नाव याप्रकरणात जोडण्यात आले.
हेही वाचा - सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रँचमधून बदली; विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ
विरोधकांनी सचिन वझेंच्या राजीनाम्याची मागणी केली. तर केंद्र सरकारने हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिला आहे. या तपासाला सुरूवात झाली असून त्यात हिरेन यांचे मित्रही काही दिवसांपासून गायब असल्याचे समोर आले आहे. मनसुख हिरेन प्रकरणी नाव समोर आलेले पोलीस अधिकारी सचिन वझे याबाबत उद्या माध्यमांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.