मुंबई - राज्यात आता राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 30 तारखेपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. अशातच आता आपल्या पक्षाचे आमदार फुटू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काळजी घेतली आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हे पवईतील रेनिन्सन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
आपल्या पक्षाचे आमदार फुटू नये म्हणून, सर्वच राजकीय पक्ष काळजी घेत आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना पवई येथील पंचतारांकित अशा हॉटेल रेनिसन्समध्ये ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे हे , रेनिसन्स हॉटेल मध्ये दाखल झाले असून सोबत अनेक शिवसेनेचे नेते आणी राष्ट्रवादीचे नेते मंडळी हॉटेलवर दाखल झाले आहेत. दोन बस भरून सर्व आमदार हॉटेलवर मुक्कामी आले आहेत.
राज्यामध्ये काल मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला सकाळीच भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदारांची बैठक घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 आमदार उपस्थित होते. आणखी काही संपर्कात असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. विधानसभेमध्ये बहुमत चाचणीसाठी आमदाराने कोणत्याही आमिषाला बळी पडू नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांना पवईतील पंचतारांकित रेनिन्सन हॉटेलमध्ये हलवले आहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होणार असे वाटले असतानाच शनिवारी महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. सकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय 'भूकंप' झाला.