मुंबई -गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचे वक्तव्य माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई होणार मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या चिठ्ठीनंतर उपस्थित वादावर नवाब मलिक यांनी गृहमंत्र्यांची पाठराखण केली आहे.
गृहमंत्र्यांविरोधात कटकारस्थान
परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर ही चिठ्ठी लिहिली आहे. परमबीर सिंग यांनी १७ मार्चला बदली होणार हे माहीत असताना १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेना भेटले, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचदरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत देशमुख गृहविलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा परमबीर सिंग यांचा प्रयत्न होता असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. हा आरोप गंभीर आहे याची चौकशी होईल या चौकशीत जे निष्पन्न होईल त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- ...उलट केंद्र सरकारच बरखास्त करावे लागेल