मुंबई - 31 डिसेंबरला मुंबई पोलिसांकडून शहरातील विविध परिसरांमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या दरम्यान 35 जणांवर कारवाई करण्यात आली. 31 डिसेंबरच्या रात्री 11 नंतर शहरामध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता. रात्री 11 नंतर हॉटेल सुरू ठेवण्याच्या संदर्भात 5 ठिकाणी मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याच्या संदर्भात मुंबई शहरामध्ये 31 डिसेंबरला 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, असून मास्क न वापरल्याप्रकरणी 14 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
ठिक-ठिकाणी होता कर्फ्यू -
महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले होते. मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी आणि जुहू इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात. मात्र, यावर्षी यावर्षी या सर्व ठिकाणी शांतता पहायला मिळाली. 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज् रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी होती.
लॉकडाऊनच्या दरम्यान झाली अशी कारवाई -
2020 या वर्षामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुंबई शहरात आतापर्यंत 27 हजार 553 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. यातील सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबई 10 हजार 674, पश्चिम मुंबई 3 हजार 820, पूर्व मुंबई 3 हजार 741, मध्य मुंबईत 2 हजार 827, दक्षिण मुंबईत 6 हजार 488 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या लॉकडाऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबई पोलिसांकडून तब्बल 56 हजार 408 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यातील 8 हजार 655 आरोपी फरार असून 22 हजार 388 आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तर अटक करून जामीन दिलेल्या आरोपींची संख्या 25 हजार 364 एवढी आहे.