मुंबई - सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सलमान खान यांच्या जीवाला धोका असल्याने सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानला स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवानाही मुंबई पोलिसांकडून देण्यात आला होता. बिश्नोई गँगच्याकडून आलेल्या धमक्या आणि केल्या गेलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांनाही झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
सुरक्षेवरून आता पुन्हा एकदा वाद राज्यातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकार मधील दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली असून शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांना मात्र वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाच्या सर्व आमदार खासदारांना सुरक्षा: विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदारांना सुरक्षा पुरवली जात आहे शिंदे गटाचे 41 आमदार आणि दहा खासदार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. या आमदार खासदारांच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत ही सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
यांची सुरक्षा काढून घेतली: माजी मंत्री जयंत पाटील, विजय बडेंटीवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे अथवा कपात करण्यात आली आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के यु चांदीवाल यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
यांची सुरक्षा कायम: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
वाय प्लस दर्जाची सुरक्षा: राज्यपाल भगतसिंह कोषारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झेड प्लस सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे राज ठाकरे यांना असलेल्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनाही एक्स दर्जावरून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे, तर खासदार श्रीकांत शिंदे यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही झेड दर्जाची सुरक्षा राहणार आहे.