मुंबई - मागील काही वर्षांपासून माहुलवासियांचे 'जीवन बचाव' आंदोलन सुरू आहे. माहुलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. प्रकल्पग्रस्त लोक या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वेळोवेळी गेल्या काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. न्यायालयाने माहुल ही जागा तेथे राहण्यासाठी योग्य नाही, असे आदेश देखील प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र, प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. माहुलवासियांना पर्यायी व्यवस्थाही प्रशासनाकडून पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे या नवीन सरकारकडून अपेक्षा ठेवत पुन्हा एकदा माहुलवासीय आझाद मैदान येथे आंदोलनाला बसले आहेत.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे पुनर्वसन आणि तानसा पाईप लाईनवरील प्रकल्पग्रस्तांसाठी माहुल येथे म्हाडातर्फे घरे बांधण्यात आली. या परिसरात मोठ्या प्रमाणात पेट्रोकेमिकलचे प्लान्ट्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. येथे राहणाऱ्या अनेकांना विविध आजार ग्रासले असून काहींचा मृत्यू झाला आहे. येथील पाणी, खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात दूषित आहेत. त्यामुळे नागरिकांना याठिकाणी मोठ्या समस्येला याठिकाणी सामोरे जावे लागत आहे. याबाबत न्यायालयाने देखील पालिका प्रशासन व राज्य प्रशासनाला पर्यायी जागा देण्यासाठी आणि पर्यायी घरे देण्यासाठी आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासन यालाही जुमानत नाही आणि त्यांनी अजूनपर्यंत माहुलवासियांना घर दिलेली नाही.
हेही वाचा - नंदुरबार जिल्हा परिषदेचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊतांचा पुढाकार
भाजप सरकारने माहुलवासियांच्या या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. मात्र, त्यावेळी विरोधी पक्षात असलेले आम्ही सत्तेत आल्यावर माहुलवासियांना नक्की घर देऊ, असे आश्वासन माहुल वासियांना विरोधी पक्षांनी दिले होते. विरोधी पक्ष आता मात्र सत्तेत आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाने माहुलवासीयांकडे लक्ष देत लवकरात लवकर नवीन घर द्यावीत, यासाठी माहुलवासीय पुन्हा एकदा आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. जोपर्यंत घरे दिली जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानातून हलणार नाही असे माहुल येथील पूजा शिंदे, बिलाल खान, सोनीबाई यांनी सांगितले.
हेही वाचा - सायन रुग्णालयाचा पुनर्विकास रखडला; चौकशीची मागणी