मुंबई - ओमायक्रॉन (Omicron Variant) विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याने विमान प्रवाशांसाठी नियमावली जाहीर (Air Travel Guidelines) केली होती. केंद्र शासनाने (Center Government) यावर हरकत घेत, नियमात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने नव्याने परिपत्रक जाहीर (Maharashtra revises air travel guidelines) करत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे राज्य आणि केंद्रामध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही देशात कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रोन सापडला आहे. वेगाने पसरणाऱ्या विषाणूंमुळे इतर देशात पुन्हा निर्बंध लागू केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकरिता नियमावली तयार केली. केंद्र सरकारने यावर आक्षेप घेत, नियमावलीत तफावत असल्याचे म्हटले. तसेच सुधारित नियमावली जाहीर करण्याच्या सूचना केल्या. राज्य सरकारने त्यानुसार आज नव्याने नियमावली जाहीर केली असून, हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. ३० नोव्हेंबरच्या आदेशाला अधिग्रहित करून तत्काळ प्रभावाने नवीन निर्देश निर्गमित केल्याचे म्हटले आहे.
काय आहेत नियम -
भारत सरकारने वेळोवेळी लादलेले निर्बंध व निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्त्वे हे न्यूनतम निर्बंध म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय आणि घरगुती विमान प्रवाशांसाठी लागू असतील.
दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे या हाय रिस्क” अर्थात अधिक जोखीम असलेले राष्ट्रांच्या श्रेणीत टाकले आहे.
उच्च जोखीम असलेले राष्ट्रांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय हा ओमिक्रोन विषाणू आढळल्यानंतर सध्या परिस्थितीच्या आधारे घेण्यात आलेला असून महाराष्ट्र शासनाला आवश्यकतेनुसार त्याचे अद्यतन करता येईल.
खालील वर्गात मोडणाऱ्या हवाई प्रवाशांना उच्च जोखीम असलेले हवाई प्रवासी म्हणून घोषित करण्यात येईल
अधिक धोका असलेल्या राष्ट्रांमधून महाराष्ट्रात दाखल होणारे सर्व हवाई यात्रेकरू.असे हवाई प्रवाशी की ज्यांनी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या अगोदर 15 दिवसात उच्च जोखीम असलेल्या राष्ट्रांना भेट दिलेली आहे.
भारत सरकारने पूर्वीच लादलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त केवळ उच्च धोका असलेल्या हवाई यात्रेकरूंसाठी खालील निर्बंध ही लागू असतील
- उच्च जोखीम असलेले हवाई प्रवाशांना प्राधान्यक्रमाने स्वतंत्र काउंटरवर उतरण्यासाठी वेगळी व्यवस्था तेथील विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केली जाऊ शकेल, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या तपासण्या आणि विविध चाचण्या करणे सोपे व्हावे. अशा सर्व हाय रिस्क हवाई प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर तत्काळ आरटीपीसीआर चाचण्या कराव्या लागतील आणि सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. त्यांची दुसरी आरटीपीसीआर चाचणी सात दिवसाच्या कालखंडानंतर करण्यात येईल.
- या चाचणीत जर कोणीही पॉझिटिव्ह आढळलयास अश्या हाय रिस्क प्रवाशांना कोविड उपचाराच्या सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात येईल आणि जर सातव्या दिवशी घेतलेल्या आरटीपीसीआर चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा उच्च जोखीम असणाऱ्या हवाई यात्रेकरूंना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.
- उपयुक्त (इमिग्रेशन) तसेच एफआरआरओ यांना असे निर्देश देण्यात आले आहे की, विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या- ज्या देशांना भेटी दिलेल्या आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे.
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडलाही (एमआयएएल) असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एयरलाईन्सकडेही द्यावी जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिल्याचे आढळलयास आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.
- देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण केले असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या ७२ तासा अगोदरचे आरटीपीसीआर ‘निगेटिव’ अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.