मुंबई - मुंबईमध्ये लसीचा तुटवडा आहे. केंद्र सरकारकडून पुरवठा करण्यात आलेल्या लसीचा साठा तीन दिवस पुरेल इतकाच आहे. लसीचा साठा कमी झाला असताना मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्राचे आज महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लस साठवणूक केंद्र हे आगामी पन्नास वर्षांची गरज पूर्ण करणारे केंद्र झाले असून याचा मुंबईची महापौर म्हणून मला अभिमान असल्याचे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
हेही वाचा - मुंबईत विविध ठिकाणी एनसीबीची कारवाई; 3 जणांना अटक
जानेवारीत होणार होते उद्घाटन
मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू केले आहे. लसीकरण सुरू करण्याआधी पालिकेने कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्र सुरू होईल, असा दावा केला होता. हे केंद्र सुरू होईपर्यंत पालिकेच्या परेल येथील एफ साऊथ कार्यालयात लसीचा साठा केला जात होता. १० लाखांच्या वर साठा आल्यास तो कांजूरमार्ग येथे ठेवण्यात येईल, अशी सुविधा या ठिकाणी उपलबध करून दिली जाणार होती. अखेर एप्रिल महिन्यात या लस साठवणूक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र, मुंबईत लसीचा साठा संपला असताना आणि नवीन लस कधी येईल याची खात्रीलायक माहिती नसताना या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
पन्नास वर्षांची गरज पूर्ण करणारे लस साठवणूक केंद्र
कोविड- १९ लसीकरणाच्या साठ्यासाठी तयार करण्यात आलेले लस साठवणूक केंद्र हे आगामी पन्नास वर्षांची गरज पूर्ण करणारे लस साठवणूक केंद्र झाले असून याचा मुंबईची महापौर म्हणून मला अभिमान असल्याचे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. कोरोना- १९ या लसीच्या साठवणुकीसाठी कांजूरमार्ग येथील परिवार संकुलात अत्याधुनिक लस साठवणूक केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यासाठी संकुलातील पाच माळ्यांपैकी तीन माळे हे लस साठवणूक केंद्रासाठी महानगरपालिकेतर्फे निश्चित करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच, या लस साठवणूक केंद्राची साठवणूक क्षमता ही १ कोटी २० लाख एवढी आहे.
पुरेसा साठा ठेवण्याची क्षमता
बाहेरील वातावरणाचा लसीवर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये, यासाठी २ डिग्री ते ८ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले ४० क्युबिक मीटरची दोन उपकरणे (walk in cooler) बसविण्यात आले आहेत. त्यासोबतच वजा 15 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले २० क्युबिक मीटरचे (walk in freezer) बसविण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. सदर शीतगृहात मुंबईला आवश्यक असलेला कोविड -१९ या लसीचा पुरेसा साठा ठेवण्याची क्षमता असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले. सदर शीतगृहे हे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठ्यावर चालविण्यात येणार असल्याने विजेची बचत होऊन पर्यावरणाला हातभार लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच, अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिट निहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात आली असल्याचे महापौर म्हणाल्या.
हेही वाचा - कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक असल्याने निर्बंध घातले; शासन व्यापारी-व्यावसायिकांच्या विरोधात नाही