मुंबई - येत्या ८ दिवसात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भाजप कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल आणि भाजपच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगरांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न व अन्य प्रलंबित मागण्यांविषयी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा दरेकर यांनी संचालकांसमोर मांडल्या. तसेच, सर्व एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. प्रवीण दरेकर यांनी भेटीनंतर, कोरोना काळात जिवाची बाजी लावणाऱ्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांशी शासनाला काही देणे-घेणे नाही. व्यवस्थापकीय संचालकांच्या म्हणण्यानुसार एसटीचे उत्पन्न १०० कोटी आहे. आणि ३०० कोटीचे पगार थकीत आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयीची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. पण, तीन महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, त्यामुळे त्यांचे घर कसे चालेल. याविषयी माणूसकीच्या दृष्टिकोनातून संवेदनशीलतेने त्यांच्याकडे बघण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर म्हणाले.
तसेच, आठ दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही, तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करणार, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. परिवहन मंत्र्यांच्या कारभारावर बोट ठेवत दरेकर यांनी त्यांचाही समाचार घेतला. परिवहन मंत्र्यांनी तीनशे रुपयांचा भत्ता जाहीर केला होता, पण अजूनपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे, कर्मचाऱ्यांना भत्ता लवकरात लवकर देण्याची मागणीही आम्ही केल्याचे दरेकर यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा देऊ, अशी घोषणाही करण्यात आली होती. पण, अजून त्या कर्मचाऱ्यांना विमा मिळालेला नाही. मृत्यू झालेल्या एसटीच्या ४३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखाचे विमा कवच तात्काळ देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच, शासनाने एसटीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आम्ही शासनाकडे एसटीसाठी २ हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. पण, शासनाने १ हजार कोटी जरी एसटी महामंडळाला दिले, तरी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगाराचा विषय मार्गी लागेल, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- 'मुंबईतील रेल्वे सेवा सुरू करा; अन्यथा, सविनय कायदेभंग करावा लागेल'