मुंबई - बीकेसी ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रिसदस्यांमार्फत चौकशी करावी, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुल दुर्घटनेची शिंदे यांनी आज (शुक्रवारी) पाहणी केली. यानंतर त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले. दरम्यान, जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
- त्रिसदस्यीय चौकशी -
वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर याना जोडणाऱ्या पुलाचा गर्डर आज (शनिवारी) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत 14 कामगार जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर या दुर्घटनास्थळाला शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. ही दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे त्रिसदस्यीयांमार्फत चौकशी करावी, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.
हेही वाचा - ...येणाऱ्या काळात कोण सोबत येईल सांगता येत नाही; उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ
- जखमींची भेट -
या दुर्घटनेत जखमी झालेल्या 14 कामगारांना व्ही. एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी 13 जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले. तर एक कामगार जखमी असून त्याच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. योग्यप्रकारे त्याच्यावर उपचार करावेत, अशा सूचना मंत्री शिंदे यांनी डॉक्टरांना दिल्या. यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही. श्रीनिवास राव, स्थानिक पोलीस अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.