नवी मुंबई - शहरातील तळोजा येथील शिवकॉर्नर बिल्डींगमध्ये एका दांपत्याने आपल्या दोन चिमुकल्यांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जीवाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी पोलिसांना सापडली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मृतामध्ये नितीश कुमार उपाध्याय (35) पत्नी बबली उपाध्याय (30) आणि अनुक्रमे 7 व 8 वर्षांचा मुलगा व मुलगी यांचा समावेश आहे. पोलिसांना नितेश उपाध्याय यांच्या घरातील हॉल आणि बेडरूममध्ये दोन सुसाईड नोट सापडल्या आहेत. हॉलमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये दागिने आणि चिठ्ठी आत ठेवली आहे, असे लिहलेले होते. तर बेडरुममध्ये सापडलेल्या चिठ्ठीमध्ये 'आम्ही आमच्या जीवाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत. आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. आमचे कुणीही नातेवाईक नसून जो कोणी आमचे मृतदेह पाहिल, त्यांनी हिंदू प्रथेप्रमाणे आमचे अंत्यसंस्कार करावेत' असे दुसऱ्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.
चौघांचे मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले असून संबधित घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असावी ,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत नितेश कुमार उपाध्याय यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गळफास घेण्यापूर्वी घरमालकाचे दोन महिन्यांचे थकीत भाडे 16 हजार रुपये सुद्धा तेथे ठेवल्याची माहिती आहे. तसेच नितीश कुमारने आत्महत्येपूर्वी व्यवसायासंबधीचे सर्व पुरावे नष्ट केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी सांगितले. उपाध्याय कुटूंब हे मूळचे उत्तर प्रदेश येथील आहेत. या अगोदर ते दिल्लीला राहत होते. त्यांचे नातेवाईक शोधण्यास पोलिसांना यश आले आहे.
शिवकॉर्नर बिल्डींगमध्ये पाचव्या मजल्यावर राजेश भारद्वाज यांचे घर आहे. 8 महिन्यांपूर्वी नितीश कुमार उपाध्याय यांनी ते भाड्याने घेतले होते. उपाध्याय हे नियमित भाडे देत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून घरमालकाला भाडे मिळत नव्हते. यासंदर्भात त्यांनी नितीश कुमार यांना बऱ्याचदा मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने शनिवारी सकाळी राजेश भारद्वाज सोसायटीत आले होते. सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्यासोबत राजेश भारद्वाज आपल्या भाड्याने दिलेल्या घरी गेले. मात्र, घर आतून बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळ असलेल्या दुसर्या चावीने दरवाजा उघडला. यावेळी नितीश कुमार उपाध्याय यांचे मुंडके पंख्याला लटकलेले आणि शरीर खाली कुजलेल्या अवस्थेमध्ये पडले होते. त्याची पत्नी आणि मुलांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याबाबत राजेश यांनी पोलिसांना माहिती दिली. तातडीने हे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. उपाध्याय याने प्रथम तिघांना ठार मारुन, त्यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.