मुंबई- अनोळखी अथवा माहीत नसलेल्या ठिकाणी जाण्यासाठी जीपीएसची यंत्रणा कामी येते. परंतु, ही यंत्रणा परदेशी बनावटी असून त्यात अनेकदा त्रुटी असतात. कधी कधी ठिकाणही चूकतात. परंतु, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच भारतीय बनावटीची आणि अचूक दिशा, ठिकाणी दाखविणारी 'ध्रुव' नावाची एक चिप तयार केली आहे. ही चिप कोणतेही ठिकाणे आणि दिशाही अचूकपणे दाखवत असल्याचा दावाही आयआयटी मुंबईतील संशोधक विद्यार्थ्यांनी केला आहे.
आयआयटीमध्ये पीएचडी आणि एमटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टीमने त्यांचा संशोधन प्रकल्प म्हणून ही चिप तयार केली आहे. लॉकडाऊनच्या आधी या चिपच्या सर्व स्तरावरील चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. या प्रकल्पाला लागलेला सर्व निधी हा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने आणि आयआयटीमधील ‘समीर’ या संशोधन संस्थेने दिला आहे. ही चिप भारतीय जीपीएस क्षेत्रात मोलाचे योगदान देईल, असा विश्वास प्राध्यापक राजेश झेले यांनी व्यक्त केला आहे.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही चिप मोबाइल, वाहनांमध्ये अथवा दिशा दर्शकाचा वापर करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या उपकरणांमध्ये बसवली जाऊ शकते. या चिपच्या माध्यमातून अचूक नेव्हिगेशन मिळू शकते. ही चिप पूर्णत: भारतीय बनावटीची असून याची जोडणी भारताचा नेव्हिगेशन उपग्रह ‘नाविक’ याच्याशी करण्यात आली आहे. यामुळे ही सेवा पूर्णत: भारतीय असणार आहे. सध्या आपण जी सेवा वापरतो त्यात परदेशातील विविध उपग्रहांची मदत घेत असतो. यामुळे जर या चिपचा वापर झाला तर ही सेवा पूर्णत: भारतीय सेवा अशी असणार आहे. जगातील अनेक प्रगत देशांनी नेव्हिगेशनसाठी स्वत:चा उपग्रह अवकाशात सोडला आहे. याची उणीव आपल्याला १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धादरम्यान जाणवली. यानंतर भारतीय अंतराळ संस्थेने जीपीएस यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आपला स्वत:चा उपग्रह तयार करण्यास सुरुवात केली. आणि नाविक हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. यानंतर याचा वापर सुरू झाला.
अंतराळातील सिग्नल ही मिळण्यास मदत...
आतापर्यंत आपल्या देशाच्या अंतराळात ३६ हजार किमी लांब असलेल्या या उपग्रहातून सिग्नल मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. या अडचणी आयआयटीच्या 'ध्रुव' या चिपने दूर केल्या आहेत, असा दावा ही करण्यात आला आहे. ध्रुव मधून अंतराळातील दूरवरचे अचूक लोकेशन कळण्यास मदत होते. आता या बोटाच्या नखावर बसणाऱ्या चिपचा वापर अनेक ठिकाणी होऊ शकतो असेही संशोधक विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.