मुंबई - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात युवकांवर इंग्रजांनी जो अत्याचार केला त्यापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टी करत आहे. नागरिकत्व (सुधारणा) कायदा हा देशविरोधीच असून या विधेयकाला आमचा विरोध आहे. या विरोधात मूक मोर्चा काढणार आहोत, असे राष्ट्र सेवा दलाचे नेते अतुल देशमुख यांनी सांगितले.
नागरिकत्व (सुधारणा) कायद्यावरून देशात वातावरण तापले आहे. अनेक संघटनांनी याला विरोध केला आहे. मुंबईमध्ये 19 डिसेंबरला राष्ट्रीय सेवा दलातर्फे या कायद्याविरोधात भायखळा ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी हेही सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - विधानसभेत भाजप-सेना आमदारांमध्ये धक्काबुक्की; शेतकऱ्यांना २५ हजारांच्या मदतीची मागणी
हा नवा कायदा भारतीय संविधानाच्या विरोधी आहे. मुस्लीम, आदिवासी, भटके-विमुक्त, जाती आणि धर्म नसलेले या सगळ्यांच्या विरोधात हा कायदा आहे. आर्टिकल 14 आणि 15 यांचे उल्लंघन करणारा हा कायदा आहे. नागरिकत्व आणि नागरिकांचे हक्क धर्माच्या आधारावर असू शकत नाहीत. भारताची सनातन धर्म राष्ट्र करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मागील काही वर्षात भाजप सरकारने युवकांचा आवाज दाबण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे, अशी टीका देशमुख यांनी केली.