मुंबई - सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला आक्षेप नाही, तर प्रवेश देण्याच्या पद्धतीला आहे. यामुळे सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन यावर तोडगा काढावा, असे माजी खासदार आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या प्रवेशाचा तिढा अद्यापही कायम आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज मुणगेकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता, पण तो रद्द करण्यात आला. यात शासनाची चुक आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश रद्द करताना मराठा आरक्षणातून प्रवेश बेकायदेशीर आहे असे म्हटले नाही. प्रवेश प्रक्रिया चुकीची आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची सरकारने फसवणूक केली आहे. गिरीश महाजन यांची या बाबत असलेली भूमिका विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. असे मुणगेकर यांनी सांगितले.