मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात प्रचंड संख्येने गर्दी होऊन संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून आली होती. या संदर्भात व्यापारी वर्गातुन तक्रार करण्यात आल्यानंतर मात्र बाजार समितीच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत असून, गर्दी टाळण्यासाठी मार्केटचे दोन विभागात विभाजन करण्यात आले आहेत. आता खारघर येथेही एमपीएससी मधील माल उतरवला जात आहे.
आशियातील मोठे मार्केट असणाऱ्या एमपीएससी मार्केटमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये राज्यात आणि राज्याबाहेरुन दररोज शेतमालाच्या 1200 ते 1500 गाड्यांची आवक होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 300 गाड्यांव्यतिरिक्त एकाही गाडीला प्रवेश दिला जात नाही आहे. मार्केट परिसरात 300 पेक्षा अधिक आवक झाल्यास त्या गाड्या खारघर मध्ये उभारलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये पाठविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. तसेच, एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंची खरेदीची ऑर्डर फोनवरुन घेणे आणि माल घरपोच पाठवण्यात येत आहे.
सुरुवातीला संचारबंदी नंतर एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणावर 1 हजार ते दीड हजार गाड्यांची आवक झाली होती. बाजार समितीत आवारात टप्प्या टप्प्याने ने 100 गाड्या सोडण्यात येत होत्या. ही गर्दी आवरता आवरता बाजार समिती प्रशासनाच्या चांगलेच नाकी नऊ आले होते. ग्राहक एकमेकांत अंतर न ठेवता गर्दी करत होते. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. त्यानंतर आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिलेल्या आदेशानुसार बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी मिळून या सर्व गर्दी वर नियंत्रण मिळवले आहे.
बाजार समिती मध्ये येणाऱ्या सर्वांचे टेम्प्रेचेर चेक करून ,हात स्वच्छ करूनच ग्राहकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आत सोडण्यात येत आहे. तसेच 300 पेक्षा अधिक गाड्यांची आवक झाल्यास खारघर सेक्टर 35 मधील सिडकोच्या मोकळया भूखंडावर स्थलांतरित करण्यात आलेल्या भूखंडावर या गाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.