मुंबई Ashish Shelar criticized Thackeray : मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर मुंबई महानगराचा परिपूर्ण आर्थिक विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, ही जबाबदारी नीती आयोगावर सोपवण्यात आली आहे. यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात राजकारण तापलं आहे. याबाबत विरोधकांचे विचार म्हणजे मूर्खांच्या नंदनवन जगणारे हे लोक असल्याचा आरोप, भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
निती आयोगावर ठपका म्हणजे मूर्खपणा : निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमण्यम यांनी मागच्या मंगळवारी मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. यानंतर मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास व त्याचबरोबर महानगराचा परिपूर्ण आर्थिक विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. तर सर्व जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपवली आहे. यावरून हा महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून आहे. उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील असतील यांनी याबाबत सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांच्या या प्रश्नाला आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. नीती आयोगावर ठपका ठेवणे म्हणजे मूर्खपणा असून त्यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचा आरोप करणे हा त्याहीपेक्षा मोठा मूर्खपणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पहिल्या ४ शहरात मुंबई : आशिष शेलार म्हणाले की, नीती आयोग एक थिंक टँक आहे. नीती आयोग काही करेल व मुंबई महाराष्ट्रापासून दूर लोटली जाईल हा आरोप म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. २०४७ पर्यंत देश जेव्हा स्वतंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तोपर्यंत प्रत्येक राज्यात प्रत्येक शहराचा विकास कसा केला जाईल, शहरांचा विकास झाला नाही तर हे उद्दिष्ट साध्य होणार नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठामपणे माहीत आहे. यासाठी नीती आयोग हे सहकार्य व मार्गदर्शन करणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून देशभरामध्ये २० शहरांची निवड केली गेली आहे. त्यात पहिल्या ४ शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे. शहराच्या विकासासाठी ग्रोथ हब तयार करणं फार गरजेचं आहे. म्हणून नीती आयोग हे महाराष्ट्र सरकारला याबाबत सहकार्य व मार्गदर्शन करणार आहे. एमएमआर रिजनमध्ये ९ महानगरपालिका येतात म्हणजे या ९ महानगरपालिका देशापासून वेगळ्या करण्याचा आरोप विरोधक करत आहेत. हा मूर्खपणा नाही तर काय आहे? असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईच्या विकासाला सातत्याने विरोध : आशिष शेलार पुढे म्हणाले आहेत की, नीती आयोग याबाबत सहकार्य व मार्गदर्शन करणार असले तरीसुद्धा यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. हा एवढा मोठा प्रश्न असून याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला, त्याबाबत केंद्र सरकारचे आभारी आहोत. परंतु विरोधकांना मुद्दे समजत नाहीत. फक्त आरोप करण्यासाठी ते आरोप करत आहेत. परंतु याच मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीत आमच्या समोर या, असं खुलं आव्हानही आशिष शेलार यांनी केलं आहे. एकीकडे दिल्ली मुंबईकडे विकासासाठी येत असताना आम्ही त्यांच स्वागत करतो. तर दुसरीकडे तुम्ही विरोध करता म्हणजे. तुमच्या मनामध्ये मुंबई विषयी दुटप्पी भूमिका आहे असा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. ठाकरे गट व राष्ट्रवादी ही मुंबईसाठी धोकादायक आहे. खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांची असून ते आमच्या सोबत आहेत, असंही शेलार म्हणाले.
ठाकरे गट व राष्ट्रवादी ही मुंबईसाठी धोकादायक : मुंबई बरोबर राज्य व राज्या बरोबर देश असतो, यात कुठेही गडबड नाही. परंतु मुंबई नागपूर प्रोजेक्ट असेल, मुंबई दिल्ली कॉरिडोर असेल, मुंबई बुलेट ट्रेन, मुंबई कोस्टल रोड, त्याचबरोबर नवी मुंबईतील विमानतळ या सर्वांना उद्धव ठाकरे यांच्याकडून अर्थात शिवसेनेकडून विरोध केला गेला. केंद्राकडून काहीही राज्याच्या, तसंच मुंबईच्या हितासाठी येत असेल तर त्याला विरोध करायचा हे यांनी ठरवून ठेवलं आहे. म्हणूनच ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी ही मुंबईसाठी धोकादायक असून, स्वतःच्या स्वार्थासाठी ते त्याचा उपयोग करत आले आहेत असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
हेही वाचा -
- Ashish Shelar on Uddhav Thackeray : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प उद्धव ठाकरेंमुळे पाकिस्तानात?
- Shelar criticized Aditya Thackeray : मोदी सरकार मुंबईला आयआयएमचे गिफ्ट देणार, कावीळ झालेल्यांना ते दिसेल का - आशिष शेलार
- Ashish Shelar : जिथं जाऊ तिथं खाऊ, नाही तर प्रकल्प अडवू; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला