मुंबई: 'अंधेरी पूर्वच्या निकालानंतर मशाल भडकली असे वक्तव्य उद्धवजी ठाकरे यांनी केले. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी दिनांक सांगावी, वेळ सांगावी. वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची हिमंत दाखवावी. भाजपा कार्यकर्ते आमनेसामने लढून उद्धवजींच्या सेनेची मशाल आहे की चिलीम हे दाखवून देतील', असे आव्हान भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिले. जागर मुंबईची दुसरी सभा आज अंधेरी पूर्व येथे झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. (Ashish Shelar challenge to Uddhav Thackeray)

त्याग करण्याची वृत्ती भाजपाच्या नेत्यांमध्ये: यावेळी आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्व विधानसभेच्या सर्व नेत्यांचे अभिनंदन करते की, त्यांनी जागर मुंबईची ही सभा गुंदवलीच्या भर रस्त्यात आयोजित केली. मी २५ वर्ष जनतेच्या विश्वासावर निवडून आलेला राजकारणी आहे. या काळात तिकीट द्या म्हणणारे अनेक राजकारणी पाहिले. पण पक्षाने दिलेले तिकीट व्यापक हितासाठी मिळालेले तिकीट परत देणारे मुरजी पटेल हे आगळेवेगळे नेते आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहीजे. पक्षाने सांगितल्यानंतर त्यागासाठी तयार राहण्याची वृत्ती भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे. जागर मुंबईचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काहीजणांच्या पोटात मुरडा सुरु झालाय. विरोधी पक्षाची टोळी मतिमंद झाली आहे. जागर मुंबईचे अभियान केवळ भाजपाला मत द्या, एवढ्यापुरते नाही. कुणा एकाला महापौर बनवायचे आहे, यासाठी देखील हे अभियान नाही. मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी हा जागर आहे.

उद्धवजींच्या शिवसेनेच्या शाखा बंद करण्याची वेळ: शेलार पुढे म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभेचा निकाल कालच लागला. तरी अंधेरीत आम्ही सभा घेत आहोत. याचे कारण अंधेरीतील जनतेशी आमचे केवळ निवडणुकीसाठीचे नाते नाही, तर त्यापलीकडचे नाते आहे. अंधेरीचा निकाल शुभसंकेत आहेत. कारण उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष भाजपाच्या मदतीशिवाय जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झालं. मुरजी पटेल निवडणुकीला उभे असते, तर आज उद्धवजींच्या शिवसेनेच्या शाखा बंद करण्याची वेळ आली असती. २०१४ च्या आकडेवारीचा अंदाज घेतला तर असे दिसून येते की, अंधेरीमधील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धवजींच्या सेनेला मतं दिलीच नाहीत. नोटाला अधिक मते मिळाली असल्याबाबत आमच्यावर आरोप केला जातो. हा आरोप खोटा आहे. जर भाजपाने आवाहन केले असते तर १२ ऐवजी ७२ हजार मते नोटाला मिळाले असते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा अंधेरी पूर्व विधानसभेतील १० पैकी ८ वॉर्डात भाजपाचा नगरसेवक निवडून आणू, असेही शेलार म्हणाले.