मुंबई - वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशिमचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेत आढावा घेतला. तसेच मुंबई-महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
नियमांचं पालन करणे आपली जबाबदारी -
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आतादेखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.
मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितले. कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत. मात्र, नागरिक म्हणून प्रत्येकाचीही वैयक्तिक जबाबदारी आहे, हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही त्यांनी सांगितले.
काय घडला प्रकार?
पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहेत. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हजारो लोक संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. या सगळ्या प्रकरणाबाबत विरोधकांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.