मुंबई - भारतात हुंडाबळीबाबत कडक कायदे असतानादेखील अजूनही पुर्णपणे हा प्रकार सुरूच आहे. हुंड्यासाठी महिलांवर होणारे अत्याचार थांबवावे यासाठी भाऊसाहेब भवर हे गेल्या २७ वर्षांपासून संदेश देण्याच कार्य करीत आहेत. घरचा त्याग करत सायकलवरून संपूर्ण भारतभर भ्रमंती करून ते हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या, अंमली पदार्थ विरोध असा विधायक संदेश देत जनजागृती करत आहेत. हा संदेश देत ते मुंबईत दाखल झाले, यावेळी ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
भाऊसाहेब हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथील रहिवासी आहेत. ते गेली २७ वर्षे उन, पावसातून जनजागृती भारतातील सर्व राज्यात फिरत आहेत. भाऊसाहेबांनी आत्तापर्यंत ५ वेळा सायकलवरून पूर्ण भारत भ्रमण केले आहे.
भाऊसाहेब यांच्या सायकलला २ राष्टध्वज आणि हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या अशा विविध प्रकारच्या मोहिमेची माहिती देणारे पोस्टर सायकलवर लावले आहेत. मुबंईच्या रस्त्यावर फिरणारे भाऊसाहेब ये जा करणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. समाजात पसरलेल्या स्त्रीभृण हत्या, हुंडाबळी अशा बिकट समस्यांविरोधात आवाज उठवून तळागाळातील जनसामान्यांमधील जनजागृतीसाठी ते सहाव्यांदा भारत भ्रमंतीसाठी निघाले आहेत. आजच्या डिजिटल युगात त्यांच्याकडे कोणताही मोबाईल, मदतीचे असे कुठलेच दुसरे साधन नाही आहे.
हेही वाचा - नौदल दिनानिमित्त 'गेट वे ऑफ इंडिया' येथे चित्तथरारक कसरती
'ईटीव्ही भारत'शी बोलताना भाऊसाहेब म्हणाले, मी सायकलवरून भटकंती करत असताना प्रत्येक राज्यातील नागरिक माझे स्वागत करतात. माझ्या अन्न निवाराची सोय करतात. मी मंदिर, गुरुद्वारा, चर्च याठिकाणी गरजेपुरताच आसरा घेतो. आत्तापर्यंत मी विविध भागात भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय छात्र सेना, कंपनी, गावागावातील प्रत्येक जनमानसात जनजागृतीपर २० हजार सेमिनार घेतले आहेत. दादरमधील वीर सावरकर स्मारक ट्रस्टने मला बोलवले होते म्हणून मी येथे आलो होतो, असे भाऊसाहेब यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या