लातूर - निलंगा तालुक्यातील जेवरी गावच्या ग्रामस्थांनी आज ७१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उप विभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे सुपूर्त केला. रोज काबाडकष्ट करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या ग्रामस्थांनी दिलेल्या निधीबद्दल उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
'आज मी धन्य झालो. महाराष्ट्रातील इतक्या गावातून पहिल्यांदाच माझ्या गावकऱ्यांनी जमवलेला हा निधी केवळ मारुती मंदिरातून माईकवर सांगून गावकऱ्यांनी जमवला. मला अभिमान नाही तर गर्व आहे माझ्या गावचा. अनेक सामाजिक उपक्रमात मोठ्या हिरीरीने सगळे सहभागी होतात याचा आनंद आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी वज्र निर्धाराची गरज आहे. ही छोटीशी खारू ताईची मदत नक्कीच आमच्या गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे', असे मत गावचे सरपंच संजय जेवरीकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच संजय जेवरीकर, उपसरपंच वैजनाथ साळुंके, जागरूक नागरिक राजू तारे, शंकर तारे, माजी सरपंच खंडू जेवळे, हरीश माने, उमेश तारे, बालाजी तारे यांची उपस्थिती होती. गावकऱ्यांनी दिलेल्या या सामाजिक सहभागाबाबत सरपंच संजय जेवरीकर यांनी आभार मानले.