लातूर - लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेच्या सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनाही एक नवऊर्जा मिळाली आहे. त्याचाच परिणाम लातूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. येथील मुख्यमंत्र्यानी दत्तक घेतलेल्या निलंगा तालुक्यातील हलगरा गावात मनसेच्यावतीने टँकरने मोफत पाणी वाटप करण्यात आले.
हलगरा येथे भीषण पाणी टंचाई असून काही मिनिटातच पाणी टँकर रिकामे होतात. मात्र, शासन या ठिकाणी मोजकेच टँकर पाठवत आहे. याचा निषेध करत, या ठिकाणी मनसेने पाणी टँकर दिला आहे. गावातील पाणी टंचाई पाहता जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी तातडीने स्वखर्चाने टँकर बोलावून जनतेला पाणी वाटप केले.
दुष्काळावर राजकारण न करता दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणाऱ्या सत्ताधारी आणि सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी स्वखर्चाने या गावाला पाण्याचे टँकर देणे गरजेचे आहे. 'दुष्काळावर नको राजकारण, देऊ मदतीचा हात' या भावनेने ज्या गावात जाऊ, तिथे पाणी टँकर घेऊन जाऊ, असे जिल्हाध्यक्ष भिकाणे यांनी सांगितले.
यावेळी तालुका उपाध्यक्ष शरीफ शेख, शहराध्यक्ष प्रदीप शेलके मनवीसे तालुकाध्यक्ष अबूबकर सय्यद, अलिम पटेल, जाधव विजय, शेख ताजुद्दीन, जुबेर खान, मोमीन समीर, शेख मझंहर, शेख अली, श्रीकांत बीराजदर, तुकाराम बंडे, प्रशांत स्वामी, दीपक भोसले, आकाश गायकवाड, बागवान गौस आदी उपस्थित होते.