लातूर - अहमदपूर तालुक्यातील शिवनखेड शिवारात एका गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोठा जळून खाक झाला असून त्यातील ४ जनावरांचाही होरपळून मृत्यू झाला. विठ्ठल कलमे या शेतकऱयाचा हा गोठा होता. या घटनेत बाजूच्या ३ ते ४ शेतकऱ्यांचे ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
शिवनखेड शिवारात शनिवारी दुपारी विठ्ठल कलमे यांच्या शेतामधील ऊसाच्या पाचटाला आग लावली. मात्र, वाळलेले पाचट आणि जोराचे वारे यामुळे ही आग पसरत गेली. काही वेळातच आगीने रुद्रावतार धारण केला आणि जवळच असलेला जनावरांचा गोठा कवेत घेतला. या आगीत ३ म्हशी आणि एका गाईचा होरपळून मृत्यू झाला आहे. गोठ्यालगत असलेले वासरूही यामध्ये गंभीर जखमी झाले असून कडब्याची गंजीचीही राख झाली. राजेंद्र कलमे, रामचंद्र गुरमे यांचा ठिबक संच आणि १ एकर ऊस जळाला आहे.
या दुर्घटनेत ३ शेतकऱ्यांचे तब्बल ८ लाखांचे नुकसान झाले आहे. २ एकरातील ऊसाचे पाचट जाळत असताना ही दुर्घटना झाली असून दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ मदतीची मागणी तहसीलदार अरुणा संगेवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, मंडल अधिकारी डी.जी. पाटील, तलाठी कमलाकर पन्हाळे यांनी पंचनामा केला आहे.