लातूर - पावसाळा सुरू होऊन एक महिना संपला तरी पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे अद्याप चित्र होते. परंतु, मोठ्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दुपारी लातूर शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे आल्हादायक वातावरण निर्माण झाले. या पावसामुळे खरिपाच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात सर्वत्र पाऊस होत असला तरी लातूर जिल्ह्यावर पावसाची अवकृपा होती. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायम होता. मात्र, सोमवारी दुपारी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आता पेरणीकामाला वेग येईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र 8 लाख 6 हजार आहे. त्यापैकी केवळ 8 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर सरासरीच्या तुलनेत केवळ 12 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणी होईल की नाही? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, रविवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पावसामध्ये सातत्य राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.