कोल्हापूर - ऊस दर नियंत्रण मंडळाची उद्या (शुक्रवार) बैठक घेण्याचा घाट अधिकार्यांनी घातला आहे. सदर मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक झाल्यानंतरच ही बैठक घेण्यात यावी. तोपर्यंत ही बैठक घेण्यात येऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.
याबाबत राजू शेट्टी यांनी अजोय मेहता यांच्याशी पत्रव्यवहार करताना म्हटले आहे की, उद्या मुंबईमध्ये ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक होणार असल्याचे समजले. मात्र, या ऊस दर नियंत्रण मंडळामध्ये शेतकर्यांचे तसेच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी नाहीत. या बैठकीत शेतकर्यांचे प्रश्न मांडता येणार नाहीत. थकीत एफआरपीवर चर्चा होणार नाही. 70-30 च्या फॉर्म्युल्यावर निर्णय अद्याप झालेला नाही. त्यावर अधिकार्यांनी परस्पर निर्णय घेऊ नये. या प्रश्नांवर केवळ शासकीय प्रतिनिधींनी ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक घेणे चुकीचे असल्याचे शेट्टी म्हणाले.
राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही. सदर बैठक रद्द करावी. तसेच ऊस दर नियंत्रण मंडळावर अशासकीय सदस्यांची प्रथमतः नेमणूक करूनच बैठक बोलविण्यात यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.